*आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!*
आषाढी एकादशी म्हणजे विठुरायाच्या भक्तीचा, हरिनामाच्या गजराचा आणि वारकरी परंपरेच्या अखंड श्रद्धेचा पवित्र उत्सव. राज्यभरातील लाखो भाविक ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात विठ्ठलनामात तल्लीन होतात. याच भक्तिमय वातावरणाची अनुभूती आता घरबसल्या घेता येणार आहे ती झी टॉकीजवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘मन मंदिरा – गजर भक्तीचा’मधून.
भक्ती, अध्यात्म आणि कीर्तन परंपरेचा सुंदर संगम घडवणारा हा कार्यक्रम दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्याचे विशेष महत्त्व अधिकच वाढले आहे. कीर्तन, अभंग, भारूड आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरातून महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचे दर्शन या कार्यक्रमात घडणार आहे.
या विशेष पर्वात महाराष्ट्रातील मान्यवर कीर्तनकार आपल्या प्रभावी निरूपणातून भक्तिरसाची उधळण करणार आहेत. सोपान सानप, संगीता चोपडे, अविनाश भारती, प्रकाश साठे, भानुदास बैरागी आणि गौरीताई सांगळे हे नामवंत कीर्तनकार आपल्या ओजस्वी वाणीने, संतविचारांनी आणि अभंगांच्या सुरेल सादरीकरणातून प्रेक्षकांना भक्तीच्या अनोख्या विश्वात घेऊन जाणार आहेत.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव यांच्या शिकवणीचा संदेश, हरिनामाचे महत्त्व आणि वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा यांचा अनुभव या कार्यक्रमातून मिळणार आहे. मनाला शांतता देणारे विचार, भक्तिभावाने ओथंबलेले वातावरण आणि अध्यात्माची अनुभूती यामुळे ‘मन मंदिरा- गजर भक्तीचा’ हा कार्यक्रम प्रत्येक घरात भक्तीचा उत्सव साजरा करणारा ठरेल.
हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार सायंकाळी ६ वाजता फक्त झी टॉकीजवर पाहायला मिळेल. विठ्ठलनामाचा गजर, संतवाणीचा अमृतवर्षाव आणि भक्तीची दिव्य अनुभूती यांचा हा सोहळा प्रत्येक भाविकासाठी पर्वणी ठरणार आहे.
