*‘काटकोन त्रिकोण’ - तीन व्यक्तिरेखा, तीन विचार आणि नात्यांच्या गुंतागुंतीच्या भूमितीचा प्रवास*
मराठी रंगभूमीवर आशयघन नाटकांची परंपरा जपणाऱ्या नाटकांमध्ये आता आणखी एका वेगळ्या कलाकृतीची भर पडणार आहे. ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक ऑगस्टमध्ये रंगभूमीवर दाखल होत असून, पोस्टरपासूनच या नाटकाने रसिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. ‘बुद्धी आणि भावना ह्यांना स्पर्श करणारं नाटक! ’ या एका ओळीतील ओळखच या नाटकाच्या गाभ्याची उत्सुकता वाढवणारी ठरते.
सर्वसामान्य वाटणाऱ्या एका कुटुंबाच्या आयुष्यात घडणारी एक घटना आणि त्यानंतर बदलत जाणारी नात्यांची समीकरणं. प्रत्येक उत्तरासोबत उभे राहाणारे नवे प्रश्न, मनात दडवून ठेवलेली सत्यं आणि भावनांच्या गुंतागुंतीत अडकलेली माणसं… ‘काटकोन त्रिकोण’ नेमकं काय उलगडणार, याची उत्सुकता मात्र शेवटपर्यंत कायम ठेवणार आहे.
या नाटकात शरद पोंक्षे, सुयश टिळक आणि प्रियांका तेंडोलकर या तीन दमदार कलाकारांच्या भूमिका असून, त्यांच्या व्यक्तिरेखांमधून आधुनिक नातेसंबंधातील अनेक छटा उलगडणार आहेत.
दिग्दर्शक अजित भुरे म्हणाले, ‘’ ‘काटकोन त्रिकोण’ हा कौटुंबिक थ्रिलर असून प्रत्येक कुटुंबात काही न बोललेले प्रश्न, काही दडवलेली सत्यं आणि काही नाती काळाच्या ओघात बदलत जातात. त्या बदलांचा वेध हे नाटक घेतं. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवत असतानाच ते स्वतःच्या नात्यांकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडेल. कथानकातील रहस्य जपणं आमच्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक प्रसंगानंतर प्रेक्षकांच्या मनात ‘आता पुढे काय?’ हा प्रश्न निर्माण व्हावा, अशी या नाटकाची रचना आहे.’’
विवेक बेळे यांनी या नाटकाचे लेखन केले असून दिग्दर्शन अजित भुरे यांचे आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे तर प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. साई पियुष यांचे संगीत लाभलेल्या या नाटकाचे नितीन नाईक सूत्रधार आहेत. चौरंगी एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘कोटकोन त्रिकोण’ ऑगस्टमध्ये रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

