*फेरे घेताना माझे हात थरथरत होते – मानसी सुभाष*
*प्रीतीच्या अटीमुळे दीप-ज्योतीसमोर नवे आव्हान*
*लग्नाचा सोहळा इतका भव्य होता की तो खरा वाटत होता.*
अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करणारी *‘दीपज्योती’* मालिका आता कथानकातील एका महत्वाच्या वळणावर येऊन पोहोचली आहे. प्रीती आणि स्वराज यांच्या लग्नात अनेक अडथळे निर्माण झाले होते. हे लग्न होऊ नये यासाठी सुभद्रा आणि प्रीतीने अनेक प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली होती. मात्र दीप आणि ज्योती यांनी हार न मानता प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना केला. अनेक अडचणी, गैरसमज आणि आव्हाने पार करत त्यांनी अखेर प्रीती आणि स्वराज यांचे लग्न घडवून आणण्यात ते यशस्वी झाले. लग्नाचा सोहळा पार पडला, सर्वांना वाटले की आता सगळे प्रश्न संपले आता नव्या आयुष्याची सुरुवात होणार. पण याच वेळी प्रीती एक अनपेक्षित अट सर्वांसमोर ठेवणार आहे.
गृहप्रवेशाच्या वेळी प्रीती स्पष्टपणे सांगते की ज्योती नाहीतर सुभद्रा आई सोबतच मी घरात प्रवेश करणार. जर सुभद्रा तिच्यासोबत नसेल, तर ती गृहप्रवेश करणार नाही. प्रीतीच्या या भूमिकेमुळे घरातील सर्वजण आश्चर्यचकित होतात. तिच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण होणार आहे. प्रीतीच्या या अटीमुळे घरात नवे प्रश्न उभे राहणार आहेत. *प्रीतीची ही मागणी मान्य केली जाईल का? सुभद्रा तिच्यासोबत गृहप्रवेश करणार का? या बिकट परिस्थितीत दीप आणि ज्योती कसा मार्ग काढतील? त्यांनी आतापर्यंत जशी प्रत्येक संकटावर मात केली, तसेच या प्रसंगालाही ते सामोरे जाऊ शकतील का?*
प्रीतीची भूमिका साकारत असेलेली *अभिनेत्री मानसी सुभाष* ने आपला या लग्नसोहळा शूटचा अनुभव सांगितलं "प्रीती आणि स्वराजचं लग्न खूप छान पद्धतीने चित्रित करण्यात आलं आहे. संपूर्ण लग्नसोहळा इतका भव्य आणि सुंदर होता की शूटिंग करतानाही तो अगदी खराखुरा लग्नसोहळा वाटत होता. प्रीतीला लग्नाबद्दल खूप आनंद होत होता. पण दुसरीकडे मानसी म्हणून माझ्या मनात वेगळेच विचार सुरू होते. फेरे घेताना मला माझ्या स्वतःच्या लग्नाचाही विचार येत होता. खरं सांगायचं तर त्या वेळी माझे हातही थोडे थरथरत होते. लग्नाचे सगळे प्रसंग खूप खास होते, पण त्यानंतर गृहप्रवेशाच्या वेळी एक मोठा ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्या प्रसंगाचे शूटिंग करतानाही आम्ही खूप मजा केली. गृहप्रवेशाआधी प्रीती एक अट ठेवते की, 'मी घरात प्रवेश करणार तर सुभद्रा आई सोबतच.' त्यामुळे पुढे काय घडतं, हे प्रेक्षकांसाठी खूपच रंजक असणार आहे."
*या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि कथानकातील पुढील रोमांचक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘दीपज्योती’, दररोज रात्री ८ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*



