*'दीपज्योती'मध्ये फुलतंय नातं, 'शुभ श्रावणी'मध्ये नात्याची कठीण परीक्षा !*
झी मराठीवरील *'दीपज्योती'* आणि *'शुभ श्रावणी'* या मालिका अधिक रंजक होत असून त्यांच्या कथानकातील अनपेक्षित वळणांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. नात्यांमधील विश्वास, प्रेम, त्याग आणि संघर्ष यांची सुंदर मांडणी या दोन्ही मालिकांमध्ये पाहायला मिळत आहे. आगामी भागांमध्ये अनेक भावनिक आणि नाट्यमय प्रसंग घडणार असून, त्यामुळे प्रेक्षक शेवटच्या क्षणापर्यंत मालिकांशी जोडलेले राहणार आहेत.
*'दीपज्योती'* मालिकेत सुभद्रा मुद्दाम पाचपरतावणीच्या जेवणात बिघाड करून घरात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून दीप आणि ज्योती एकत्र येऊन नव्याने स्वयंपाक करतात. स्वयंपाक करताना त्यांच्यात होणारी नोकझोक आणि छोट्या-छोट्या वादातून दोघांमधील वाढत चाललेली जवळीक यामुळे मालिका वेगळं वळण घेणार आहे.
दरम्यान, स्वराज आणि प्रीती यांचा संसार सुखाचा राहावा यासाठी दीप आणि ज्योती एकत्र काम करण्याचा निर्णय घेतात. याच वेळी सुभद्रा, स्वराजने प्रीतीला दिलेली भेटवस्तू खराब करते. घरातील वातावरण बिघडू नये म्हणून ज्योती हा दोष स्वतःवर घेणार आहे. तिच्या या निर्णयामुळे कुटुंबातील शांतता टिकून राहते आणि तिच्या मोठेपणाची झलकही पाहायला मिळणार आहे. पुरुषोत्तमच्या ६०व्या वाढदिवसाविषयी ज्योतीला कळल्यामुळे पुरुषोत्तम यांच्यासाठी खास सरप्राईज वाढदिवसाचे आयोजन होणार आहे.
*'शुभ श्रावणी'* मालिकेत श्रावणीला घरात सतत अपमान आणि अवहेलनेला सामोरे जावे लागत असले, तरी शुभू प्रत्येक संकटात तिची ठाम साथ देताना दिसणार आहे. विश्वंभरचा राग दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यातच शुभूची नोकरीही जाते. या परिस्थितीचा फायदा घेत काही जण शुभू आणि श्रावणी यांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी नवे डाव आखू लागतात. दुसरीकडे, सानिकाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात होते. याच दरम्यान सानिकावर मोठे संकट येणार आहे. शुभू आणि श्रावणीच्या आयुष्यात यापुढे कोणती नवी आव्हाने येणार? शुभू आणि श्रावणीचे नात या संकटांवर मात करेल? कुटुंबातील कटकारस्थानांना ते कसे सामोरे जातील ?
*'दीपज्योती'मध्ये दीप-ज्योतीचं फुलत जाणारं नातं, तर 'शुभ श्रावणी'मध्ये शुभू-श्रावणीच्या नात्याची होत असलेली कठीण परीक्षा प्रेक्षकांना भावनिक प्रवासाचा अनुभव देणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका 'दीपज्योती' दररोज रात्री ८वा. आणि 'शुभ श्रावणी' दररोज संध्या. ६.३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*



