Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*ठरलं तर मग मालिकेतला अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने सांगितला वारीचा अनुभव*

 *हातात वीणा, मुखात विठुमाऊलीचा जागर*


*ठरलं तर मग मालिकेतला अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने सांगितला वारीचा अनुभव*


स्टार प्रवाहच्या माऊली महाराष्ट्राच्या निमित्ताने प्रेक्षकांना घरबसल्या वारीचा आनंद अनुभवायला मिळत आहे. फक्त प्रेक्षकच नाही तर आदेश बांदेकरांसोबत स्टार प्रवाहचे अनेक कलाकार या वारीत प्रत्यक्ष सहभागी होऊन हे अद्भूत क्षण अनुभवत आहेत. 



स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेतील अमित भानुशाली देखिल वारीमध्ये सहभागी झाला. या अनुभूतीविषयी सांगताना तो म्हणाला, ‘वारीचं नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. कारण पंढरपूरची वारी ही केवळ चालण्याची नाही… ती एका साधकाची, भक्ताची आणि माणसाच्या आत्म्याची यात्रा आहे. ही यात्रा शरीराने चालली जाते, पण पोहोचते ती थेट हृदयाच्या गाभाऱ्यात. या वर्षी मला या वारीचा भाग होण्याचं सौभाग्य मिळालं. त्या अनुभवाने आयुष्यभर पुरेल अशी एक अद्भुत उर्जा, भक्ती आणि समाधान दिलं. वारीच्या प्रवासाची सुरुवात झाली आळंदीहून – तीच आळंदी, जिथे आपले ज्ञानयोगी संत श्री ज्ञानेश्वर माऊली समाधिस्थ आहेत. त्या ठिकाणी पाऊल ठेवताच एक विलक्षण स्पंदन जाणवतं. ना ते शब्दात सांगता येतं, ना पूर्णपणे समजावता येतं. त्या जागेचा प्रत्येक कण, प्रत्येक वारा, प्रत्येक घंटानाद सगळं काही आत्म्याला भिडणारं असतं. माझं आणि आळंदीचं नातं फार जुनं आहे. लहानपणी दरवर्षी तिथं जायचो. ती माझ्यासाठी दुसरं घरच होती. त्या गल्ल्यांतून अनवाणी फिरणं, ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीसमोर डोकं ठेवून बसणं, पायऱ्यांवर बसून पूजापाठ करणं, प्रदक्षिणा घालणं हे सगळं माझ्या बालपणाचा भाग होतं. पण अभिनयाच्या प्रवासात वेगवान धावपळ सुरू झाली आणि आळंदी हळूहळू मागे पडली. एक मोठा काळ गेला… जिथं मी त्या पवित्र भूमीत पाऊलच ठेवू शकलो नाही.

मात्र यंदा स्टार प्रवाहच्या माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा वारीचा भाग होता आला तेव्हा पुन्हा आळंदीत पोहोचलो. तेव्हा जे काही जाणवलं – ते शब्दांपलीकडचं होतं. त्या मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच संपूर्ण शरीरात एक विजेसारखी ऊर्जा संचारली. जणू काही माऊली म्हणाली “किती वर्षं झाली बाळा, तू आला नाहीस… पण मी वाट बघत होते!” डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यावेळेस मनात नेमकी काय भावना होती ते मलाच समजत नव्हतं. हजारो वारकरी माझ्या सभोवती होते, पण माझ्या डोळ्यांसमोर फक्त माझा विठोबा होता. तेवढ्या गर्दीतही मला वाटलं, विठू माऊली माझ्या शेजारी आहे, आणि हलक्या स्वरात माझ्या कानात सांगतेय,“घाबरू नकोस रे बाळा… मी आहे ना, तुझ्या प्रत्येक पावलात, तुझ्या प्रत्येक स्वप्नात.” पावसाचा शिडकावा, रस्त्यावर चिखल, पाय पूर्णपणे भिजलेले, शरीर ओलं…पण त्या क्षणी कोणताही त्रास जाणवत नव्हता. पावलं चालत होती, पण थकत नव्हती.



जणू प्रत्येक थेंब विठोबाचं आशिर्वाद बनून अंगावर पडत होता. हातात वीणा, मुखात ‘विठ्ठल विठ्ठल’चा अखंड गजर… आणि मन? मन तर अगदीच हरवलं होतं एका वेगळ्याच विश्वात. जिथे मी आणि फक्त माझा विठोबा होता. वारीत एक गोष्ट ठळकपणे जाणवते, इथे कोणी अभिनेता नाही, कोणी डॉक्टर नाही, कोणी उद्योगपती नाही… इथे सगळे फक्त वारकरी! माणसाची खरी ओळख पार विसरतात इथे… आणि उरतो तो फक्त ‘भक्त’. वारी चालताना शरीर थकतं, पण आत्मा फुलत जातो. त्या भक्तीच्या धुंदीत चालणं म्हणजे जणू देवाच्या मांडीवर बसल्यासारखं वाटतं. माझ्या आयुष्यात इतका शुद्ध, निर्मळ आणि प्रेममय अनुभव याआधी कधीच आला नव्हता अशी भावना अमित भानुशालीने व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.