*निवडणुकीच्या रिंगणात उतरले सत्या व मम्मी; कोण मारणार बाजी?*
'सन मराठी'च्या प्रेक्षकांसाठी 'कॉन्स्टेबल मंजू' व 'जुळली गाठ गं' या दोन्ही मालिका रात्री ८ ते ९. ३० वाजता दाखविल्या जात आहेत. 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत निवडणुकीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. सत्या- मंजूच्या लग्नानंतर निवडणुकांमुळे त्यांच्यात दुरावा पाहायला मिळत आहे. एकाच घरातून दोन उमेदवार लढत असताना मंजू तिच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये अडकली आहे. एकीकडे सत्या आपल्या परिसरात बदल व्हावा यासाठी स्वतः मैदानात उतरून प्रचार करतो. तर दुसरीकडे मम्मी सत्तेसाठी साम, दाम, दंड, भेद या साऱ्या गोष्टींचा वापर करून काहीही करून विजय आपलाच झाला पाहिजे असा निर्धार करतात. आता या निवडणुकीच्या मैदानात नक्की कोणाचा विजय होणार हे पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे.
*मालिकेतील या नव्या ट्विस्ट बद्दल अभिनेता वैभव चव्हाण म्हणाला की,* "खऱ्या आयुष्यात मी कधीच प्रचारांमध्ये सामील झालो नाही. खऱ्या आयुष्यात मी योग्य व्यक्तीला मतं देण्याचं काम करतो मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि तो आपण नक्कीच बजावला पाहिजे. मालिकेमुळे मला उमेदवार होण्याचा आणि प्रचार करण्याचा अनुभव मिळाला आहे. प्रचार नेमका कसा करावा, लोकांपर्यंत आपला मुद्दा कसा पोहोचवावा, हे सगळं शिकायला मिळत आहे. सत्यामुळे माझ्या स्वभावात पण काही बदल होत आहेत. मालिकेत सत्याबरोबर मम्मी सुद्धा उमेदवार आहे, त्यामुळे शूटिंग करताना खूप मजा येते. निवडणुकीचं वातावरणच काहीसं वेगळं असतं ज्यामध्ये उत्साह, स्पर्धा आणि थोडा तणावही जाणवतो. या निवडणुकीमुळे सत्या- मंजू यांच्यात बरेचदा गैरसमज होतात. निवडणुकीमध्ये सत्या विजयी होईल का? सत्यापासून मंजू दूर जाईल का? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. तर यासाठी प्रेक्षकांना मालिका पाहावी लागेल."