*स्टार प्रवाहच्या लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत येणार नवा ट्विस्ट*
*काव्याच्या नावाचा टॅटू जीवा नष्ट करणार*
*अभिनेता विवेक सांगळेने सांगितला शूटिंगचा थरारक अनुभव*
स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम चं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. जीवा आणि काव्याच्या नात्याचा गुंता वाढत असतानाच आता जीवाने एक टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. काव्यावरच्या प्रेमाची असलेली एकमेव निशाणी म्हणजेच काव्याच्या नावाचा टॅटू जीवा नष्ट करणार आहे. नंदिनीचा लग्नावरचा विश्वास उडू नये यासाठी जीवाने हा निर्णय घेतला आहे.
हा थरारक सीन शूट करणं तितकंच आव्हानात्मक होतं. मालिकेच्या संपूर्ण टीमने या सीनसाठी खूप मेहनत घेतली होती. या सीनच्या शूटिंगविषयी सांगताना अभिनेता विवेक सांगळे म्हणाला, ‘गेल्या महिनाभरापासून या सीनबद्दल सतत चर्चा होत होती. त्यामुळे मानसिकरित्या मी या सीनसाठी तयार होतो. हा संपूर्ण सीन नाईट शिफ्टमध्ये करण्यात आला आहे. जळतं लाकूड छातीवर ठेवण्याचा सीन करताना खूप काळजीपूर्वक सर्व हाताळावं लागत होतं. कुठेही ईजा होणार नाही याकडे संपूर्ण टीमचं लक्ष होतं. एक अभिनेता म्हणून अश्या पद्धतीचे सीन करायला मिळत आहेत यासाठी मी स्वतला भाग्यवान समजतो. मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. यापुढे देखिल अनेक घडामोडी मालिकेत घडणार आहेत. तेव्हा नक्की पहा लग्नानंतर होईलच प्रेम सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’