जागतिक पर्यावरण दिन आणि येऊ घातलेल्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीने हाती घेतला वृक्षारोपणचा उपक्रम...
या महत्वाच्या उपक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे लाभले मोलाचे सहकार्य
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनी आणि बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला. या खास प्रसंगी स्टार प्रवाहच्या मालिकेतील लोकप्रिय कलाकार अर्थात ऋजुता देशमुख, रुपाली भोसले, अभिषेक रहाळकर, समृद्धी केळकर आणि कश्मिरा कुलकर्णी उपस्थित होते. निसर्ग रक्षणाचा वसा हाती घेऊन या कलाकारांनी ब्रांद्रा परिसरात वृक्षारोपण केलं.
या प्रसंगी रुपाली भोसले म्हणाली, ‘निसर्गाचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आम्हाला एका छान उपक्रमात सहभागी होता आलं याचा आनंद आहे. लहान मुलांचे जसे आपण लाड करतो, संगोपन करतो अगदी तसंच झाडांचंही असतं. झाडाला जितकं प्रेम, जितकी माया देऊ तितकं ते बहरत जातं. आज जे रोपटं मी लावलं आहे त्याचं नाव मी तथास्तु ठेवलं आहे. मी प्रेक्षकांना देखिल आवाहन करेन की प्रत्येकाने एक तरी झाड लावायला हवं. ही संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाह वाहिनीचे आभार.’
अभिनेत्री ऋजुता देशमुख म्हणाल्या, ‘खूप भारावून टाकणारा अनुभव होता. निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचं सुख शब्दात व्यक्त करता येणार नाही. निसर्गाने आपल्याला भरभरुन दिलं आहे त्याला जपुया हेच याक्षणी सांगावसं वाटतंय.’