*अल्ट्रा झकास ओटीटीवर भरणार अभिनयसम्राट 'पद्मश्री अशोक सराफ' यांचा चित्रपट महोत्सव*
*मुंबई, 3 जून २०२५ –* अशोक सराफ... नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर उभा राहतो एक हसमुख चेहरा, धमाल विनोद, गावरान माणुसकीनं ओतप्रोत भरलेला कलाकार आणि आता त्याच्या नावापुढे लागलीय एक खास ओळख "पद्मश्री अशोक सराफ" भारत सरकारकडून नुकताच त्यांना "पद्मश्री" पुरस्कार मिळाला आणि तोही फक्त पडद्यावरच्या कलाकृतींसाठी नाही, तर त्यांच्या अभिनयामधून घडलेल्या संवेदनशील, माणसासाठी! हा पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा कलाकार फक्त अभिनय करत नाही, तर जनतेच्या हृदयात आपली जागा बनवतो. मुळात नुसतं स्टार होणं सोपं असतं, पण “मामा” बनून घराघरात माणसाच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफसारख्या कलाकारालाच जमलं. म्हणून त्यांच्या कलेला मानवंदना देऊन अल्ट्रा झकास घेऊन आलंय ‘अशोक मामा चित्रपट महोत्सव'.
रंगभूमीवरून प्रवास सुरू करून मामांचा छोट्या पडद्यावरून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा म्हणजे मेहनतीचं आणि जबरदस्त टॅलेंटचं जिवंत उदाहरण.साऱ्यांनी त्यांच्या अभिनयातून हसणं शिकलं, आणि आयुष्यात संकटं आली तरी माणसाने माणसाशी नातं कसं जपायचं हेही त्यांनी शिकवलं. अशोक मामांचा जगभरात गाजलेला "अशी ही बनवाबनवी" चित्रपट तर सगळ्यांना माहितीच आहे, पण ह्या वेळी आम्ही घेऊन आलोय काही निवडक खास सिनेमे जे तुमचं मन जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. पाहूयात कोणते आहेत ते सिनेमे…
अशोक सराफ यांनी चित्रपटक्षेत्रात आपले पदार्पण केले तेव्हा बँकेत नोकरीला होते. त्यांनी त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि स्वतःच्या अभिनय क्षमतेनुसार निवडल्या. ‘अफलातून’ (1991) मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका त्यांनी केली, तर ‘एक डाव भुताचा’ (1982) मध्ये मराठा सैनिकाच्या भूताची भूमिका साकारली. विशेष बाब म्हणजे 'आपली माणसं'(1992) या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्याने त्यांना उत्कृष्ट अभिनयासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ या पुरस्काराने सन्मानित केले. ‘वजीर’ (1994) मध्ये त्यांनी सत्ता आणि महत्त्वाकांक्षेसाठी कोणतीही सीमा न ओलांडणाऱ्या पात्राची भूमिका केली. ‘इना मिना डिका’ (1998) मध्ये चतुर फसव्या डॉक्टराचा अभिनय केला आणि ‘सून माझी लाडकी’ (2005) मध्ये कुटुंबातील गुंतागुंतीत त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
‘ऐकावं ते नवलच’, ‘देवघर’, ‘पैंजण’, ‘मोस्ट वाँटेड’, ‘कोणासाठी कुणीतरी’, ‘डीड शहाणे’, ‘या टोपीखाली दडलंय काय?’, ‘आंधळी कोशिंबीर’ हे काही चित्रपट म्हणजे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील ठळक टप्पे ठरले. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेत वेगळा रंग, वेगळी छटा आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणारी उंची त्यांनी गाठली आहे. अशोक सराफ हे असे अभिनेते आहेत, ज्यांच्या अभिनयशैलीला तोड नाही. ज्या भूमिकेत ते झळकतात त्या भूमिकेला वेगळीच ऊर्जा आणि जिवंतपणा मिळतो. हास्य असो की हळवेपणा, खलनायकी छटा असो की साधेपणा त्यांच्या अभिनयाची सर आजवर कुणालाच जमली नाही. त्यांनी आपल्या अनुभवाने, उत्साहाने आणि कलेच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली. शिवाय आजही ते तितक्याच ताकदीने काम करत आहेत, त्यांच्या या जिद्दीला मनापासून सलाम!
‘गुलछडी’, ‘फटाकडी’, ‘मोसंबी नारंगी’, ‘भन्नाट भानू’ हे चित्रपट अशोक सराफ आणि सुषमा शिरोमणी यांच्या अभिनयातील अप्रतिम केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले. त्यांच्या चित्रपटातील एकत्रित कामगिरीमुळे या चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिसवर यश मिळवले नाही, तर प्रेक्षकांच्या हृदयावर खोलवर प्रभाव टाकले.
हे सगळे चित्रपट म्हणजे फक्त सिनेमे नाहीत तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहेत, जे एकदा पाहिलं की पुन्हा पुन्हा आठवतात आणि म्हणूनच, हा 'अशोक मामा चित्रपट महोत्सव' तुमच्यासाठी खास अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर अशोक मामांच्या सिनसृष्टीतील कलेला उजाळा देण्यासाठी आहे.
अशोक सराफ यांच्या चित्रपटसृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले . महाराष्ट्र राज्य सरकारने २०२३ मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो. २०२२ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. तसेच, २००६ मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारकडून 'वि. शांताराम पुरस्कार' देऊन त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेतली गेली. यासोबतच त्यांना अनेक मान्यवर पुरस्कार मिळाले आहेत. अशा कलाकाराला मिळालेल्या या पुरस्कारांनी त्यांची मेहनत आणि कला क्षेत्रातील मोठे योगदान स्पष्ट होते.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले "अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर संपूर्ण पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या अभिनयाने नक्कीच लोकांना हसवलं, विचार करायला लावलेलं आहे. पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकाराला मिळणं ही संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे. म्हणूनच अशोक मामांच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर ‘अशोक मामा चित्रपट महोत्सव’ घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी पुन्हा एकदा त्यांच्या 'त्या' अमर भूमिका पाहाव्यात आणि अशोक मामा यांच्या अभिनययात्रेला मनापासून दाद द्यावी, हीच इच्छा."