Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*स्वामींचा नवा अध्याय, उपदेश स्वामींचा, कौल तुमच्या मनाचा!*

 *स्वामींचा नवा अध्याय, उपदेश स्वामींचा, कौल तुमच्या मनाचा!* 

जय जय स्वामी समर्थ सोम ते शनि रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.


 *मुंबई, २७ जून २०२५ –*  कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय आणि श्रद्धास्थानी असलेली मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ आपल्या अध्यात्मिक प्रवासात १५०० भागांचा एक महत्त्वपूर्ण टप्पा नुकताच पार पडणारी ठरली. ही मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहिली नाही, तर अनेक प्रेक्षकांच्या जीवनात प्रेरणा, दिशा आणि श्रद्धास्थान बनली आहे. या अनोख्या प्रवासाचा गौरव करत, वाहिनीने एक आगळीवेगळी संकल्पना सादर केली आहे – ‘उपदेश स्वामींचा, कौल तुमच्या मनाचा’ ही संकल्पना प्रत्येक प्रेक्षकाला थेट स्वामींच्या अलौकिक कृपाप्रसादाचा प्रत्यय देणारी आहे. स्वामी समर्थांच्या असंख्य उपदेशांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नांना समर्पक उत्तर उपलब्ध करून देणे,हा उद्देश या उपक्रमाचा आहे.



स्वामींच्या उपदेशातून भक्ताला त्याच्या प्रश्नांची उकल होत जाते. प्रेक्षकांनी पाठवलेले निवडक प्रश्न कथारूपाने मालिकेत सादर केले जातात. कथा जरी काल्पनिक असली, तरी तिच्यातून उद्भवणारा प्रश्न हा भक्ताच्या आयुष्यातील खऱ्या समस्येवर आधारित असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर स्वामींच्या उपदेशांमधून, त्यांच्या चरित्रातून, त्यांच्या कृतीतून दिलं जातं. या उत्तरांसाठी श्री गुरुलीलामृत (वामनरावजी वैद्य), बखर श्री स्वामी समर्थ (गोपालबुवा केळकर), अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ चरित्र आणि इतर संशोधनपर ग्रंथांचा आधार घेतला जाईल. आतापर्यँत ७५९ प्रेक्षकांनी आपले प्रश्न कलर्स मराठीला पाठवले असून तुम्ही देखील तुमच्या मनातील प्रश्न पाठवा https://colorsmarathi.com/updeshswamincha या वेबसाईटवर. आणि पाहत राहा जय जय स्वामी समर्थ सोम ते शनि रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.


तुमचा प्रश्न हजारो लोकांसाठी दीपस्तंभ ठरू शकतो. या उपक्रमाचं एक वैशिष्ट्य असंही असेल की, विचारले जाणारे प्रश्न हे सामान्य माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या, अनेकांना भिडणाऱ्या समस्या असतील — ज्यांचं उत्तर फक्त त्या भक्ताला नव्हे, तर अनेकांना मार्गदर्शन करणारं ठरेल. त्यामुळे एका उत्तरातून शेकडो लोकांना दिशा मिळेल. या संकल्पनेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रश्न देणाऱ्या व्यक्तीची गोपनीयता जपली जाणार आहे. केवळ त्या व्यक्तीचं नाव आणि गाव दाखवलं जाईल. प्रश्न खाजगी स्वरूपाचा असेल, तरी त्यातून सर्वांच्या मनात असलेला प्रश्न साकार करता येईल का, हे पाहूनच त्याची निवड केली जाईल. जय जय स्वामी समर्थ’ ने आजवर स्वामी समर्थांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा देणाऱ्या कथांचा खजिना प्रेक्षकांपुढे खुला केला. आता या नव्या पर्वातून प्रेक्षक आणि स्वामी यांच्यातील एक थेट संवाद निर्माण होणार आहे. हा संवाद श्रद्धेचा, मार्गदर्शनाचा आणि समाधानाचा असेल. या संवादातून केवळ प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, तर त्या उत्तरांमधून स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळेल.


 *याविषयी बोलताना मालिकेचे लेखक आणि श्री स्वामी समर्थ विषयातील अभ्यासक शिरीष लाटकर म्हणाले,* स्वामी समर्थांचा उपदेश त्रिकालाबाधित असून आजही मार्गदर्शक आहे. आधुनिक तणाव, स्पर्धा, स्वार्थ आणि नात्यांतील ताण यातून मार्ग शोधण्याची गरज आहे. स्वामींच्या वचनांत कर्म, भक्ती, नातेसंबंध, यश आणि परमेश्वर यांची स्पष्ट दिशा सापडते. "मैं गया नहीं हूँ" या वचनाला जागून स्वामी आजही भक्तांचा उद्धार करत आहेत. स्वामींचा उपदेश दीपस्तंभासारखा अंधारात प्रकाश देतो. प्रत्येक समस्येला अनुरूप असा उपदेश शोधून गोष्ट सांगण्याचा हा प्रयत्न आहे. ही मांडणी समकालीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांना बळ देणारी ठरावी ही आशा. स्वामी उपदेश महाराष्ट्रभर पोहोचावा, भक्तांना आनंदाचं झाड गवसावं, हाच खरा हेतू आहे.  या आठवड्यात सुरु होणारी नवी कथा स्वामी भक्ताने विचारलेल्या प्रश्नांवर आधारित आहे. या आठवड्यात आपल्याला बघायला मिळणार आहे सुमित्राची गोष्ट. हि गोष्ट अक्कलकोटच्या सुमित्रा नामक एका श्रद्धाळू स्त्रीभोवती फिरते, नवरा गोविंद आणि मुलगा महेश असे हे त्रिकोणी कुटुंब आहे.


स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा असली तरी शुभ-अशुभ संकेत, शकुन-अपशकुन, दृष्ट , करणी यांसारख्या गोष्टींनी सुमित्राचं मन गोंधळून गेलं आहे,अंधश्रद्धांमध्ये अडकलेलं आहे. एका नव्या वास्तूत या कुटुंबाने  प्रवेश केल्या नंतर तिच्या आयुष्यात अनेक विचित्र घटना घडू लागतात, ज्या सुमित्राच्या मनातील भीतीला खतपाणी घालतात. स्वामी सतत तिला समजावत असतात की खरी श्रद्धा ही विवेकातून येते, पण भीतीच्या सावलीत गुरफटलेली सुमित्रा हे लक्षात घ्यायला तयार नाही. आणि याच मानसिक गोंधळाच्या वातावरणात तिच्या भोळेपणाचा कुणीतरी फायदा घेतो. आता स्वामी तिला यातून कसे सोडवणार, कसे मार्गदर्शन करणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.